Tuesday, June 28, 2011

ओळख....

सूर्याच्या किरणानाही अंधाराची ओढ असते,
छोट्याश्या झरोक्यातून, ते घरामध्ये लपून बसते.....
इवल्या इवल्या वेली सुद्धा वृक्षाचा आधार होतात,
प्रत्येकाला कुठल्यातरी सहाऱ्याची गरज असते....
अवखळ ओढे नदीला भेटले कि शांत होतात,
दोघामध्ये जणू आई-मुलाचे नाते असते....
आयुष्याच्या प्रवासात, कित्येक मित्र येवून जातात,
त्यांनी जपलेली आठवण, हीच आपली ओळख असते....

Monday, June 27, 2011

खेद....

तुझ्या आठवणीत, सारी रात्र जागत होती,
फिटलेले कर्ज, पुन्हा पुन्हा मागत होती......
विझलेला चेहरा, माझ्या मनातीलच होता,
वाटणारी भीती पण, अनाकलनीय होती....
लाटेने उध्वस्त केलेले आयुष्य वेचताना,
काळाची सगळी, गणितेच चुकत होती....
कापलेले पंख घेवून उंच उडणारी पाखरे,
झाडावरती यायला केविलवाणी होत होती.....
भर पावसात तिकडे वणवा कहर करतोय,
ढगांची झुंड येथे, पाणी मागत फिरत होती...
अस्तित्वाच्या साऱ्या खुणा कधीच पुसून गेल्या,
आठवणही भूतकाळात, स्वतःला शोधत होती.....
मंदिरात गेलो, पण देवाकडे काय मागू?
पापपुण्याची रास तेथे अडगळीत रडत होती....

वाटते मजला......

वाटते मजला सखे मी अंबारीचा मेघ व्हावे,
होवुनी थेंब त्याचा हळुवार तूज स्पर्शून जावे.....
सागराच्या उंच लाटा, चुंबिती गगनास त्या,
त्या तळाच्या शिम्पल्यांचे दुखः मी हलके करावे....
अंकावरी चंद्रमाच्या, रात्र आहे पहुडलेली,
चांदण्यांनी भोगीलेले, एकांत मी मोजून घ्यावे....
गर्द मेघांनी जरी तो सूर्य आहे झाकोळलेला,
उल्केने पण का स्वतःला व्यर्थ असे जाळून घ्यावे....
वादळे सांगून गेली, व्यर्थता या जीवनाची,
मांडीलेले डाव सारे, मी कसे सोडून द्यावे.....
अंतरीचे गंध सारे, मुक्त उधळूनी वाऱ्यावरी,
झिजवुनी आयुष्य सारे, मी पुन्हा मागे उरावे....
आज या अंतिम समयी, मी असा बहरून गेलो,
कि शांत होणार्या दिव्याच्या, ज्योतीने उजळून जावे.....

Saturday, June 25, 2011

रहस्य कवितेचे माझ्या...

मला स्वतःला, कधीच कवी म्हणवून घ्यायचं नाही,
माझी कविता भोळी आहे, तिला काही सांगायचं नाही...
अधून मधून मला, काही शब्द सुचत असतात,
हृदयाच्या आत खोलवर, कुठे तरी टोचत असतात.....
बरेच असे शब्द, तसे वरवर खूप थंड दिसतात,
कधी कधी मात्र अचानकच, बंड करत असतात....
सुरु होते मनात मग, एक अनामिक लढाई,
शब्दांची भावनांवर, अन भावनांची शब्दावर चढाई..
दोघानाही वाटत, हे युद्ध आपणच जिंकाव,
अव्यक्ताला व्यक्त करायला, आपण पुढे व्हावं.....
कसा समजवायचं त्यांना, दोघानाही तितकंच महत्व,
दोघांविषयी मलाही, तितकंच वाटत असतं ममत्व....
असा करताना मग त्यांना, माझी तगमग कळते,
शब्द वळतात भावनेकडे, भावना शब्दाकडे वळते.....
एकापुढे एक असे दोघे मग, अलगद येऊन बसतात,
रसिक मित्र त्याला, मग माझी कविता म्हणतात......

Thursday, June 23, 2011

स्व-वंचना...

कधी कधी आपण स्वतःलाच फसवत असतो,
आपलं दुःख झाकण्यासाठी जगाला हसवत असतो...
माहित असतं आपल्याला, आयुष्य हे असंच असतं,
तरी सुद्धा वेदनेला, कुरवाळून बसत असतो...
आपलं सुख ओरबाडून दुसऱ्याला देताना,
एकटेपणाच विष, आपल्यातच भिनवत असतो...
आयुष्याच्या धाग्यामध्ये दुसऱ्याला ओवताना,
आपणच विणलेले धागे आपणच उसवत असतो...
एक वेळ मग अशी येते, आपलं कुणीच नसतं,
तरीही गर्दीत हरवल्याचं जगाला भासवत असतो...

प्रवास.........

आज म्हटलं पुन्हा थोडं मागे वळून पहावं,
जाण्या आधी अडगळीत, आठवणीना शोधावं......

वहीच्या पानामध्ये एक मोरपीस होतं,
अजून वेडं स्वतःशीस गोड हसत होतं..

आठवणींच एकेक पदर उघडू लागला,
गेलेला प्रत्येक क्षण पुन्हा दिसू लागला...

देवळा समोर झाडावर सूरपारंब्यांचा खेळ,
आयुष्य गुंफून टाकणारा तो थोडासाच वेळ...

आणलेली शिदोरी आम्ही येथेच सोडली,
गोड कडू वाटून घेत, साऱ्यांनीच खाल्ली...

जसे मोठे होत गेलो, सारेच मग विखुरले,
नवे रस्ते शोधताना, जुने थोडे विसरले...

आयुष्याचा प्रवास असाच चालू राहिला,
सांजवेळेचा वारा मग, हळूच वाहू लागला....

पिंपळाच्या पानाची आता जाळी झाली होती,
रंगीबेरंगी नक्षीची किनार काळी झाली होती....

मावळतीचे रंग आता आपले वाटू लागले,
हळू हळू पायही, तिकडेच चालू लागले.....

क्षितिजापारच्या जगाची ओढ वाटू लागली,
फुललेल्या फुलाची पाकळी गळू लागली...

असाच एके दिवशी सूर्य, अंधाराआड जाईल ,
वठलेल्या बुंध्यातून मग एक कोवळा कोंब येईल ...



.

बंधन.....

कधी कधी असं होतं, काहीच कळत नाही,
वणव्यात उडी मारून देखील, शल्य काही जळत नाही.....

बेधुंद पावसाच्या सारी अंगावर धावून येतात,
भावनांना पूर येतो, मात्र मन काही भरत नाही.... .

दूरच्या जळणाऱ्या दिव्यांनी, रात्रीची जाणीव होते,
तुझ्या भेटीची सांज मात्र, मनातून सरत नाही...

कित्येकदा वाटते, त्या अंधारात झोकून द्यावे,
तुझा आठव आलाकी मात्र, पाय तिकडे वळत नाही...

का अशा बंधनात, तू मला अडकून ठेवलेस?
समोरच मृत्यू दिसतोय, पण जगणे मात्र संपत नाही....

.

धरतीमाय...

भिजलेल्या श्रावणान एकदा विचारलं,
सांग आता धरती कशी रे दिसते?
क्षणभरही विलंब न लावता नी बोललो,
ती मला अगदी आई सारखी भासते...
आकाशान दिलेला प्रत्येक थेंब,
ती आपल्या कुशीत घेत असते,
माझी पण आई अगदी तशीच,
साऱ्या चुका पोटात घालत असते...

दिखावा...

आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांचा
प्रकाश देण्यासाठी उपयोग नसतो,
त्यांचा दिसणारा लखलखाट,
केवळ लक्ष वेधण्यासाठी असतो...
स्वतः जळून जगाला प्रकाश देणे,
हा धर्म सुर्यानेच पाळावा,
अस्तित्व पणाला लावून जगण्यातला अर्थ,
परप्रकाशी चांदण्यांना कसा कळावा?

माझी कविता.....

माझ्या कवितेला नाव नाही,
मोठेपणाचा आव नाही,
स्वच्छंद विहरण तिला भावतं,
तिचं निश्चित कुठलं गांव नाही....
ती कधी इथे असते,
ती कधी तिथे असते,
खळखळून हसता हसता,
पटकन रुसून बसते...
तरीही जोवर ती आहे,
तोवरच मी आहे,
तिच्याशिवाय जगण्याला,
सांगा काय अर्थ आहे?

ओळख...

सूर्याच्या किरणानाही अंधाराची ओढ असते,
छोट्याश्या झरोक्यातून, ते घरामध्ये लपून बसते.....
इवल्या इवल्या वेली सुद्धा वृक्षाचा आधार होतात,
प्रत्येकाला कुठल्यातरी सहाऱ्याची गरज असते....
अवखळ ओढे नदीला भेटले कि शांत होतात,
दोघामध्ये जणू आई-मुलाचे नाते असते....
आयुष्याच्या प्रवासात, कित्येक मित्र येवून जातात,
त्यांनी जपलेली आठवण, हीच आपली ओळख असते....

खेद.......

सरतात आहे असे दिवस माझे,
कि वाहतो कुणाचे निरर्थक ओझे....
पाहुनी आरसा मला समाधान झाले,
इथे कुणाचेही न पाऊल वाजे..
तोडण्या तो पीत पक्व आम्र,
...केले कुणी दगड काळजाचे माझे....
उरात जखमा अनंत झाल्या,
त्यावरी जाहले कुणी आज राजे....
आक्रंदते ती शांतता भयाने,
बोलावती कोण नाव घेवून माझे?

Tuesday, June 21, 2011

उद्वेग.......

माणसामधलं आज, माणूसपण हरलं आहे,
मंदिर ओस पडलंय, कारागृह भरलं आहे......
चिमणी पिलं चाऱ्यासाठी दारोदार फिरत आहेत,
सडलेल अन्न उकिरड्यावर पसरलं आहे.......
पाप पुण्याची इथे कोणालाच चाड नाही,
देऊळ मात्र नवसाच्या नारळांनी भरलं आहे......
सावित्रीच कपाळ, कुंकवाला महाग होतंय,
वारांगनेच्या गळ्यात, भलं मोठं डोरलं आहे.....
ढगाकडे द्यायला, पाण्याचा थेंब नाही,
मध्यान्हीच्या सूर्याला, काजव्यांनी घेरलं आहे......
माझ्याच हातानी मी, माझी कबर खोदली,
माती लोटायला मात्र, इथ कोण उरलं आहे?

Sunday, June 19, 2011

मनातलं काही...........

मी मला पाहिल्याचं मला फारस आठवत नाही,
तसा मी इतरांच्याही आयुष्यात डोकावत नाही....

आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असतं,
कुणाचं आयुष्य सरळ असतं, कुणी सारखं पडत असतं....

फांद्या नसलेला माड नारळांनी भरलेला असतो,
हवेच्या थोड्या बदलान, आंब्याचा मोहोर गळून पडतो....

वाकडी तिकडी वाट सुद्धा घराकडे सरळ नेते,
सुखाच्या मार्गाला पण कधी कधी मरगळ येते...

उभे खडे कडे, लंगडे सहज चढून जातात,
केवळ एका स्पर्शानेही मुके सारे बोलून जातात...

चाकोरीतच चालायचं,असा काही ठरलेलं नसतं,
भरलेल्या ताटात सुद्धा, खायला काही उरलेलं नसतं...

परिस्थितीला समोर जाण, हाच एक मार्ग असतो,
विषातही अमृत पाहिलंत,तर इथेच सारा स्वर्ग असतो...



.

तरीही " मेरा भारत महान......."

सूर्याची आता कोणालाच गरज नाही,
सगळीकडे काजव्यांच राज्य आहे,
कृत्रिम दिव्यांच्या या लखलखाटात,
त्याचं अस्तित्वहि आता त्याज्य आहे...

बुरुजावर फडकाताहेत अंधाराचे झेंडे,
सायंकाळ भिकारणीसारखी भटकते आहे,
खुल्या बाजारात मान खाली घालून,
प्रकाशाची अब्रू भरदिवसा लटकते आहे...

एरंडाचाच आता इथे दिमाख आहे,
कल्पवृक्षाचा त्यांना भाव आला,
सुखाची फळे त्यांनीच चाखली,
ज्यांनी चढवल्या त्यांना फुलमाला..

सत्यवचनी असलेल्या साऱ्यांना फक्त,
इथे अपमानच सहन करावा लागतो,
जगाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्याना,
पावलोपावली सलाम करावा लागतो...

अंधार नगरीच्या या सम्राटांच्या पुढे,
शुक्राच्या चांदणीलाही नाचावं लागतंय,
जगाच्या उद्धारासाठी लढणार्यांना,
भ्रष्टाचाराच विष पचवावं लागतंय......

प्रत्येक वीराचा इथे दगड झाला आहे,
कुठूनही एक फुत्कार उमटत नाही,
निष्क्रियतेची पट्टी डोळ्यावर ठेवून
कधीही कोणता प्रश्न सुटत नाही....

बहरलेल्या झाडांना इथे किंमत नाही,
वठलेल्यांची मात्र पूजा होते आहे,
लाचाराना इथे सत्तेचे बक्षीस मिळते,
स्वाभिमानी साऱ्यांना सजा होते आहे...



.

मला वाटतं...

जगता जगता मरावं कि मरता मरता जगू द्यावं,
झाडाखाली पडलेलं, प्रत्येक फुल मग वेचून घ्यावं.....

आपले कुणी नसले तरी, दुसरे सारे आपलेच असतात,
आपलं पुस्तक मिटून, आपण त्यांचंच पुस्तक वाचून घ्यावं.....

आपलं माणूस शोधण्यामध्ये, सगळं आयुष्य निघून जातं,
आपल्या मनाला बोचणारं सारं, आपल्याच मनाला सांगावं.....

भरून आलेले ढग सुद्धा अश्रू ढाळून हलके होतात,
आपण मात्र डोळ्यातलं पाणी, पापणी मध्येच वाळू द्यावं.....

आठवणींचे ओहाळ अजून चहुबाजूनी वाहतच आहेत,
तुझ्यासाठी वाटतं त्यांना, असंच कायम वाहू द्यावं........



.

आव्वाज नकोय...

आता तू रोजच्या सारखा, त्रास मला देवू नको,
माझ्याशी बोलता बोलता, दुसरीकडे पाहू नको.....
इतर सगळ्या कितीही असोत, मी इथे एकटीच आहे,
अपर्णा गोरी असली, तरी माझ्यापेक्षा नकटीच आहे...
ती गौरी तर कायम गौरी सारखी घुमत असते,
चार पावलं चालली नाहीत, तोवर लगेच दमत असते...
प्राची तर अशी आहे, अंधारात फक्त दात दिसतात,
चेहऱ्यावर कायम तिच्या, पावडरचे थर असतात..
कल्याणीच सांगू नको, ती तुला पटणार नाही,
तिच्या बरोबर हिंडणं, तुझ्या खिशाला झेपणार नाही..
मला सुद्धा अरे, त्या प्रतिक बरोबर जाता येईल,
पण मी गेले तर सांग, तुझ्याकडे कोण पाहिल?
सांगायचं तात्पर्य इतकंच,तुला हवं ते घडणार नाही,
कितीही तू प्रयत्न कर, पण मी तुला सोडणार नाही.....



.

प्रश्न...

केलेत बंद त्यांनी खिडक्या गवाक्ष दारे,
बाहेर मुक्त वारा, त्यांना उगा पुकारे...

धारा सहस्त्र ओल्या अंगावरून गेल्या,
कोरड्या मनात माझ्या फुलतात का निखारे.....

पाऊस माणसांचा तो कोसळे निरंत,
कोणीच आत नाही, कि गेले लयास सारे?

मी आज प्रश्न माझे, शोधिले उत्तरात,
काहीच आकळेना, झालेत शब्द कोरे....

कारण तो माझा बाप होता....

दोनच सदरे आणि दोनच विजारी,
एव्हढ्यावर सारे वर्ष साजरे करी,
तो माझा बाप होता.........

कष्टाने रापलेली ती राकट काया,
डोळ्यात मात्र असायची अपर माया,
तो माझा बाप होता.........

पोरांवर कधी हात टाकला नाही,
पैशासाठी स्वाभिमान विकला नाही,
तो माझा बाप होता.........

साऱ्यांच्या सुखासाठी रात्रंदिवस झटला,
आपला सारा आनंद, दुसर्यांना वाटला,
तो माझा बाप होता........

स्वतः मीठाबरोबर भाकरी खाल्ली,
पोरांना मात्र भाजीची सोय केली,
तो माझा बाप होता.......

पोरांच्या गरजेला सारे काही दिले,
प्रसंगी आपले औषध बाजूला ठेवले,
तो माझा बाप होता.........

परिस्थितीचे चटके स्वतःवर घेतले,
आपल्या हाताने आमचे पाय चेपले,
तो माझा बाप होता......

सगळे त्याला गृहीत धरत होते,
त्यालाही हे सारे कळत होते,
तो माझा बाप होता....

आंब्याच ते एक डेरेदार झाड होतं,
स्वतः तापून आम्हाला सावली देत होतं,
तो माझा बाप होता.......

त्याच्या हातात हात, कि सारं सोप्पं असायचं,
काळ्याकुट्ट काळोखात, सगळं लख्ख दिसायचं,
तो माझा बाप होता........

कोसळत्या पावसात तो छप्पर झाला होता,
घोंगावणार्या वादळात त्याचाच आधार होता,
तो माझा बाप होता....

आमच्या यशात त्याचाच वाटा होता,
आमच्या मागे त्याच्या पुंण्याचा साठा होता,
तो माझा बाप होता......

उगवता सूर्य, त्यानेच तर दाखवला,
जगण्याचा अर्थ, त्यानेच तर शिकवला,
तो माझा बाप होता.....

तो होता तोवर, त्याचे महत्व कळले नाही,
त्याच्या कवचामुळे आमचे हात पोळले नाही,
तो माझा बाप होता.......

आज जेंव्हा हे सारं उमजत आहे,
बाप काय असतो, थोडंसं समजत आहे.......
बापा सारखा बापच, दुसरा कोणी असणार नाही,
त्याच्या सारखी माया, दुसरा करू शकणार नाही...
बापाला मोजायला कोणतीच पट्टी नसते,
आभाळाची भव्यता, सागराची खोली असते...
एव्हढ्याशा शब्दात तो असा मावणार नाही,
त्याचे उपकार फेडायला जन्महि पुरणार नाही....

कारण? कारण तो माझा बाप होता..........

मी एकटा....

एकटीच रात्र आहे,
एकटाच दिवस आहे,
एकटेपणाच ओझं घेवून,
जगणारा मी एकटा आहे....
ऋतूहि एकटेच आहेत,
वर्षेही एकटीच आहेत,
आषाढात बरसणारे,
अश्रूही एकटेच आहेत....
घरही एकटेच आहे,
रस्ते हि एकटेच आहेत,
आठवणींचे येणारे,
कढही एकटेच आहेत.....
आयुष्यहि एकटे आहे,
मृत्यूही एकटा आहे,
रात्री सोबत देणारा,
चंद्रही एकटा आहे.....
एकट्या अशा वाटेवर,
चालणारा मी एकटा आहे,
शब्दांच्या या साम्राज्यात,
शब्द माझा एकटा आहे....