Wednesday, January 15, 2014

निधर्मी भारत.....

"निधर्मी" जातीयवादाच सगळीकडे पेव फुटलं आहे,
राष्ट्रीय एकात्मतेला, या नेत्यांनीच पुरतं लुटलं आहे.......

जन्माला येण्यापुर्वीच, माणसाची जात जन्म घेते,
प्रत्येक पिढीचं भविष्य, जातीमध्येच गुंतलं आहे........

जन्मताना माणूस असतो, कुठलीच नसते जातपात,
तरीही आयुष्याचा चाक, जातीय दलदलित रुतलं आहे....

भडकविणारे नेतेच, निधर्मीपणाचा आव आणतात,
जातीपातीच्या सुत्रानीच मतांचं गणित सुटलं आहे......

माणसाचा धर्म कर्मावर ठरतो, कुठेही जन्माला तरी,
समजतं पण उमजत नाही, रक्तात तेच भिनलं आहे....

कोसळणाऱ्या पावसाला, कधीच रोखता येत नाही,
पण मुक्त वाहणारं पाणी, राखीव जागात अडलं आहे....

कधीतरी लोंढा यावा, फुटून जावीत जातीची धरणे,
तेंव्हाच कळेल साऱ्यांना, विकासाचं गणित सुटलं आहे......

No comments:

Post a Comment