Thursday, March 6, 2014

अवेळ......

तुला वाटायचं,
मी काहीच बोलत नाही,
माझी तक्रार होती,
तू काहीच ऐकत नाहीस....
असेच दिवस सरून गेले,
एकमेकांना शोधण्यात,
आपण जातच राहिलो, पुढे..... पुढे....
जगणं तसंच मागे ठेवून......

आता तुला मला ऐकायचंय,
पण मला काहीच सांगायचं नाहीय,
कालपर्यंत तू मला हवा होतास,
आता मी तुला हवी आहे......
भौतिक सुखा पलीकडे असतात काही गोष्टी,
प्रेम,
भावना,
ओढ.....
तुला कधी जाणवलंच नाही.......

दिवस सरत गेले....
मीही बदलत गेले......
आज तुला मला ऐकायचंय.....
पण मला काहीच सांगायचं नाहीय.....
अवेळी पडणाऱ्या पावसानं,
असतील धरणे भरत.....
पण शेतातलं उभं पीक जमीनदोस्त होतं....
पाणी तेच असतं रे......
फरक पडण्याच्या वेळेत असतो.....
नाहीतर जिवंत माणसाला बुडवणाऱ्या त्याने,
प्रेत नसतं तरंगत ठेवलं.........

No comments:

Post a Comment