Monday, March 17, 2014

संघर्ष.....

माणसाचं आयुष्य हे संघर्षानं भरलेलं आहे. जन्माला येण्यापासून ते मृत्यू पर्यंत त्याला अविरत संघर्ष करावा लागतो. पण या संघर्षानच त्याचा आयुष्य धारदार बनत, त्याला कोणत्याही संकटाला तोंड देण्याची शक्ती या संघर्षानच मिळते. साधे उदाहरण घ्या. आपण रस्त्यावर वाहन चालवतो. प्रचंड गर्दीत, रस्त्यावरून वाहने आडवी तिडवी जाताना, मधेच एखादा दुचाकीस्वार आपले कौशल्य दाखवतो, कोणीतरी " हा रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे " असे समजून रस्ता पार करायला मध्ये घुसतो.... या सगळ्याचा अनुभव घेत घेत आपण एक कौशल्यपूर्ण चालक बनतो.. हा रहादारीशी आपला एक संघर्षाच असतो. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो कि आपला उत्कृष्ठ चालक बनतो. पण आपण रहदारी आहे म्हणून वाहन चालवलेच नाही तर? तर आपण परावलंबी होतो. बाहेर जाण्यासाठी कोणावर तरी आपल्याला अवलंबून राहावे लागते आणि हे आपली कमजोरी आयुष्यभर रहाते.


एकदा एका महाविद्यालयात जीवशास्त्राचा तास सुरु होता. प्राध्यापक शिकवत होते, " सुरवंटाचे फुलपाखरू कसे होते".. त्यांनी वर्गात एक कोष आणला होता, ज्यातून एक फुलपाखरू बाहेर पडत होते. त्या फुलपाखराची धडपड चालली होती त्या कोषातून बाहेर येण्याची. प्राध्यापकांनी सांगितले, हे फुलपाखरू कसे बाहेर येते ते पहा, तो पर्यंत मी बाहेर जावून येतो. पण कोणीही त्या फुलपाखराला किंवा कोषाला हात लावायचा नाही. आणि ते बाहेर गेले.

मुले निरीक्षण करत होती, ते फुलपाखरू आपली सारी शक्ती पणाला लावून त्या कोषातून बाहेर यायचा अथक प्रयत्न करीत होते, पण त्याला बाहेर येणे जमत नव्हते. त्या विद्यार्थ्यातील एकाला तो संघर्ष पाहवला नाही आणि त्याने त्या कोशाचे आवरण थोडे बाजूला केले. फुलपाखरू सुखरूप बाहेर आले, पण काही वेळातच ते मेले.

प्राध्यापक वर्गात आले आणि त्यांनी विचारले, फुलपाखरू आले का बाहेर? त्यावर विद्यार्थ्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर प्राध्यापक म्हणाले, हे मला अपेक्षितच होते. जेंव्हा ते फुलपाखरू कोषातून बाहेर यायचा प्रयत्न करीत होते, त्याच प्रयत्नांनी ते सुदृढ बनत होते, त्याच्यात शक्ती निर्माण होत होती, ती शक्तीच तुम्ही नष्ट केली. फुलपाखराच्या काही दिवसांच्या आयुष्यात हा कोषातून बाहेर येणारा संघर्षच त्यांना ताकदवान बनवतो. तो संघर्षच तुम्ही थांबवला, त्यामुळे त्याचा मृत्यू अटळ होता... तुमची सहानुभूती त्याचा जीव जाण्याला कारण ठरली. प्रत्येकवेळी सहानुभूतीनेच माणसाला बाल मिळते असे नाही, तर त्याला संघर्षासाठी दिलेल्या उत्तेजनाने तो संघर्षावर मात करू शकतो.

संघर्षावर मात करून मिळवलेले यश माणसाला आत्मविश्वास, समाधान आणि आनद देवून जाते. एक कोटीची लॉटरी लागणे कोणाला नको असते? पण जर एक कोटी रुपये पगार मिळाला, तर त्याचा आनंद अधिक असतो. जगात कोट्याधीश कोटीने आहेत. लॉटरीमुळे त्यात फक्त एकाची भर पडली. पण महिन्याला किंवा वर्षाला एक कोटी पगार घेणारे किती आहेत? हाच तो फरक आहे.

मी मध्यंतरी जग प्रसिध्द लेखक शिव खेर यांचा माझ्या कंपनीने केलेला प्रशिक्षण वर्ग केला. रोज सकाळी आम्हाला ते तुम्ही या वर्गात शिकलेल्या गोष्टी अमलात आणण्याचा काय प्रयत्न केला हे विचारायचे. त्यामध्ये माझ्या एका सहकार्याने सांगितलेला अनुभव खूप काही सांगून जातो. त्याला ५-६ वर्षाची मुलगी आहे. एक दिवस तिला उंचावर ठेवलेले एक खेळणे हवे होते. जागा खूप उंच नसली, तरी तिच्यासाठी ती उंचच होती. तिने खेळणे आईकडे मागितले. आई ते तिला देणार इतक्यात तो सहकारी म्हणाला, थांब, मी बघतो. त्याने तिला विचारले, तुला ते खेळणे का काढता येत नाही? तिने स्वाभाविक उत्तर दिले, ते उंचावर आहे, माझा हात पोहोचत नाही. मग तो म्हणाला, जर तुझा हात तिथपर्यंत पोचला, तर तू स्वतः ते काढशील का? मुलगी म्हणाली, हो. मग त्याने तिला घरातले स्टूल आणायला सांगितले. ते खेळण्याजवळ ठेवून तिला त्यावर चढवले ( तिला उंच स्टुलावर एकटीला चढणे शक्य नव्हते ). आणि खेळणे काढायला सांगितले. तिने ते काढले आणि ते तिने स्वतः काढले याचा तिला इतका आनद झाला कि दिसेल त्याला ती सांगत होती कि खेळणे तिने काढले. याला म्हणतात संघर्षातून मिळालेले समाधान. Joy of achievement ...

आपल्या भारतात असेच कांहीसे घडत आहे. म्हणजे " राखीवजागा " या गोष्टीचा मुल उद्देश बाजूला पडून त्याचा आता उपयोग आता मतासाठी आपले निर्लज्ज राज्यकर्ते करीत आहेत. बाबासाहेबांचा यामागचा हेतू काय होता हे कोणीच ध्यानात घेत नाही. वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणणे हा त्याचा हेतू होता. परंतु आज ६५ वर्षे झाली, तरीही तो हेतू साध्य झाला नाही. उलट रोज रोज नवीन धर्म, जाती जमाती आरक्षण मागताहेत. आरक्षण हे वरील गोष्टीतील स्टुला सारखे वापरायला हवे. ते हि जसे लहान मुलीसाठी वापरले, तसे. मोठे झाल्यावर सुद्धा जर तिने स्टूल मागितले, तर काय होईल? आज आरक्षित लोकांना कोठेही संघर्ष करावा लागत नाही. शिक्षणात आरक्षण, नोकरीत आरक्षण... त्यामुळे त्यांच्यातील झुंझार वृत्तीच नष्ट झाली आहे. आणि त्यामुळे अजूनही त्यांना राखीव जागेच्या कुबड्या लागतात, कारण आत्मविश्वास नाही... जेंव्हा माणूस पोहायला शिकतो, तेंव्हा सुरुवातीला बंद डबा, हवेची ट्यूब वगैरेचा आधार घेतला जातो. पण हा आधार असतानाच त्याने हात पाय मारायला शिकले पाहिजे. ट्यूब मुळे आपण तरंगतो हेच जर मनात ठसले गेले, तर तो पोहायला कधीच शिकणार नाही आणे ट्यूबचा आधार गेला, तर पाण्यात बुडून मृत्यू अटळ आहे...

याउलट, जो वर्ग आरक्षणरहित आहे, अशनी आपली प्रगती खूप केली, कारण त्यांनी संघर्ष केला, संकटाना, वाईट परिस्थितीला तोंड देण्याची त्यांच्यात ताकद आली.....

तेंव्हा संघर्षाला घाबरू नका, असा संघर्ष तुम्हाला अजून बलवान होण्यास मदत करेल....

No comments:

Post a Comment