Tuesday, March 18, 2014

करावे तसे भरावे...

आपलं आयुष्य हे प्रतिध्वनी सारखं असतं. जे आपण देतो, तसंच आपल्याला फळ मिळतं. जमिनीत जांभळाच झाड लावलं, तर त्याला आंबे नाहीत येणार.... जसं आपण दुसऱ्याशी वागतो, तशीच आपल्याला वागणूक मिळते.


एका गावात एक शेतकरी एका बेकरीवाल्याला रोज १ किलो लोणी देत असे. असं बरेच वर्ष चालू होतं. एकदा त्या बेकारीवाल्यान विचार केला, हा आपल्याला रोज एक किलो लोणी देतो आणि आपण घेतो. कधीतरी त्याचे वजन करून पाहू. म्हणून त्याने एकदा लोण्याचे वजन केले. ते १ किलोपेक्षा कमी भरले. त्याने त्या शेतकऱ्यावर फिर्याद दाखल केली. न्यायाधीशाने शेतकऱ्याला विचारले, काय रे तू याला रोज १ किलोपेक्षा कमी लोणी देतोस हे खरे आहे काय? शेतकरी बोलला, सरकार, मी निरपराध आहे. जर ते लोणी १ किलोपेक्षा कमी भरत असेल, तर त्याचा दोष बेकरीवाल्याकडे आहे. माझ्याकडे वजन काटा आहे, पण प्रमाणित वजन नाही. मी रोज या बेकरीवाल्याकडून १ किलोचा पाव घेतो आणि तो पाव एका पारड्यात ठेवून लोणी वजन करून देतो. जर पाव १ किलो पेक्षा कमी असेल, तर लोणीही कमीच असणार.... त्यामुळे खरा दोषी तो आहे, मी नाही.

आपल्या चांगल्या कामासाठी दुसऱ्यांनी आपले कौतुक करावे, स्तुती करावी असे प्रत्येकालाच वाटत असते आणि त्यात चूक काही नाही. पण अशावेळी आपण दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक किती करतो हे पण लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या चांगल्या गोष्टीचे योग्यवेळी ( म्हणजे लगेचच ) कौतुक करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला चांगले काम करायचा हुरूप येतो. केलेल्या कामात चुका काढणे प्रत्येकालाच येते. पण त्याचे कौतुक करणे सर्वांनाच जमत नाही, कारण त्याला वेगळी मानसिकता लागते. येथे खुपदा इगो आडवा येतो. आपले मन खुले असावे. कौतुकाचे शब्द बोलायला पैसे पडत नाहीत. पण पैशापेक्षा श्रीमंत असे मन मात्र असावे लागते.

1 comment: