Wednesday, March 19, 2014

"ऐकणे" आणि "ऐकून घेणे" ( Hearing and Listening )

एखादी गोष्ट "ऐकणे" आणि "ऐकून घेणे" यात प्रचंड फरक आहे. ऐकणे या क्रियेत फक्त कान हा एकाच अवयव कार्यरत असतो, तर ऐकून घेणे या क्रियेत कान, मेंदू आणि मन, या गोष्टी कार्यरत असतात. त्यामुळेच बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला काही काळानंतर आठवत नाहीत. त्या आपल्या Short Memory मध्ये जातात आणि नंतर पुसून जातात. पण जेंव्हा एखादी गोष्ट आपण नीट ऐकून घेतो, त्यावेळी आपला मेंदूपण सक्रिय असतो आणि अशा गोष्टी आपल्या कायमच्या लक्षात राहातर आणि त्या गोष्टींचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. ऐकणे या प्रकारात आपण त्या बोलण्यातील आपल्याला सोयीस्कर भाग आपण घेतो, विशेषतः असा भाग जो आपल्याला प्रिय असतो किंवा आपली प्रिय व्यक्ती, वस्तू यांच्याशी निगडीत असतो. पण ऐकून घेणे या क्रियेत विषय कशाशीही निगडीत असो, आपल्या लक्षात राहतो. हा मानवी स्वभाव आहे.


खूप वेळा ऐकणे या प्रकारामुळे लोकांबद्दल गैरसमज निर्माण होतात. समज "क्ष" ही व्यक्ती "य" या व्यक्तीबद्दल बोलत असेल, तर आले "य" शी काय नाते आहे, आपले त्याच्याशी कसे संबंध आहेत याच दृष्टीने आपण विचार करतो आणि आपली प्रतिक्रिया हि तशीच असते. जर "य" बरोबर आपले संबंध जिव्हाळ्याचे असतील, तर त्याच्याबद्दल वाईट बोललेले आपल्याला सहन होत नाहीत. पण समजा त्याच्या बरोबरचे आपले संबंध चांगले नसतील, तर त्याच्या बद्दलचे चांगले बोलणे आपल्याला सहन होत नाही. "ऐकून घेणे" या क्रियेमध्ये आपली भूमिका तटस्थ असावी, त्यामुळे व्यक्ती किंवा वस्तू बद्दल नेमके काय चांगले आणि काय वाईट याचा अंदाज आपल्याला घेता येतो. एखाद्या अतिशय चांगले संबंध असलेल्या व्यक्तीचे नकारात्मक गुण आपल्याला माहित नसतात. तसेच एखाद्या व्यक्तीबद्दल आपण फक्त वाईटच ऐकलेले असते, त्याची सकारात्मक बाजू आपल्याला माहित नसते. ऐकून घेण्याच्या सवयी मुळे आपल्याला सर्व बाजू माहित होतात.

जेंव्हा आपण ऐकून घेत असतो, तेंव्हा त्या व्यक्ती बरोबर आपला संवाद होतो, बोलणे नाही. संवाद आणि बोलणे यातही खूप फरक आहे. संवादामुळे विचाराची देवाण घेवाण होऊ शकते, बोलण्याने वाद होतात. आणि एकदा वाद सुरु झाला कि विचारांची देवाण घेवाण संपते, आणि एकमेकाची उणी-दुणी काढणे सुरु होते आणि असे बोलणे कधी व्यक्तिगत पातळीवर येईल याची खात्री नसते.

नेतृत्व हा गुण विकसित होण्यासाठी "ऐकून घेणे" हा गुण अतिशय महत्वाचा आहे. नेत्याला एखादा निर्णय देताना घटनेच्या दोन्ही बाजू तितक्याच माहित असायला हव्यात. नाहीतर निर्णय चुकू शकतो आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम होवू शकतात.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांमध्ये "ऐकून घेणे" ही कला विकसित करायला हवी आणि ते अतिशय महत्वाचे आहे. कारण या मुलांतूनच उद्याचे नेतृत्व पुढे येणार आहे.

No comments:

Post a Comment